जामऋषी नगर, मालाड (पू) येथे लागलेल्या भीषण आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन विभाग हद्दीतील या रहिवाश्यांना नैसर्गीक आपत्ती प्रसंगी शासनाद्वारे दिल्या जाणा-या नुकसान भरपाई करिता पात्र नसल्याने खास बाब म्हणून आपातकालीन परिस्थिती म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाद्वारे विशेष मदत जाहिर करुन बाधीत कुटूंबाना वितरीत करण्यात यावी अशी मागणी मागील दोन दिवसां पासून आमदार सुनिल प्रभु यांनी मुख्यमंत्री कार्यालय, पालक मंत्री उपनगर जिल्हा तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतु शासनाकडे अद्याप कोणतीही मदत या कुटुंबीयांना मिळालेली नाही त्यामुळे ती मदत लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आमदार प्रभु यांनी आज पुन्हा केली आहे. काल आग लागल्याची घटना कळताच क्षणी आमदार सुनिल प्रभु यांनी घटना स्थळी भेट देऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
आमदार प्रभु यांनी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने, मृत पावलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना रुपये एक लाख एवढी मदत केली असून, आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या घरातील कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत विरतीत करण्यात आली.
तसेच सदरहू आगीत बाधीत कुटूंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन केंद्रसरकार व राज्य सरकारच्या समन्वयातून नजीकच्या परिसरात तात्काळ करण्यात यावे, तसेच आजूबाजूच्या परिसरात भितीचे वातावरण पसरले असून शासनाकडे सात हजार रु भरलेल्या तसेच शासनाच्या २०११ च्या नियमानूसार पात्र कुटूंबांचे पुनर्वसन तात्काळ करण्यासाठी कालमर्यादीत- नियोजनबध्द पुनर्वसन योजना तात्काळ जाहिर करुन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन हद्दीत राहणा-या जनतेचे पुनर्वसन करावे, अशी जोरदार मागणी आमदार सुनिल प्रभु यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
यावेळी विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभाग प्रमुख गणपत वारीसे, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, उपविभाग संघटक सानिका शिरगावकर, शाखा प्रमुख मोहन परब, संजीवनी रावराणे, युवा सेनेचे चेतन जाधव, राजेश साळुंखे, कृष्णा प्रसाद आदी उपस्थित होते.