Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’

*माजी लष्कर अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडणार –‘ऑपरेशन सिंदूर : नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’*


*मुंबई, (सां. प्रतिनिधी) :* ‘ब्राह्मण सेवा मंडळा’चा शतकमहोत्सवी श्री गणेशोत्सव २०२५ हा केवळ भक्तिभावाचा सोहळा नसून सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे. या विशेष पर्वात माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर (नि.) आणि माजी लेफ्टनंट जनरल सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि.) यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली असून, या दोन्ही मान्यवरांना ज्येष्ठ पत्रकार व लेखक डॉ. उदय निरगुडकर बोलतं करणार आहेत.

*‘ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार’* या अत्यंत रोचक विषयावर ही मुलाखत होणार असून कार्यक्रम दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८ वाजता, ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड, दादर (प), मुंबई येथे आयोजित केला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मंडळाने केले आहे.



*मान्यवरांविषयी थोडक्यात माहिती :*


*ले. ज. विनायक पाटणकर (नि.)* – जवळपास चार दशके भारतीय सेनेत कार्यरत असताना त्यांनी काश्मीर, ईशान्य भारत, आर्मी एव्हिएशन आणि दिल्ली मुख्यालय अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. उत्तम युद्ध सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक या सन्मानांनी ते गौरवले गेले आहेत. सेवा निवृत्तीनंतरही ते औरंगाबाद येथील 'सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था' तसेच 'सरहद' आणि 'असीम' या संस्थांद्वारे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत आहेत.


*ले. ज. सुदर्शन श्रीकांत हसबनीस (नि., PVSM, VSM, ADC)* – जानेवारी २०२० मध्ये ते डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी कारगिल युद्धातील ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम तसेच जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. परम विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक यांनी ते सन्मानित झाले असून सध्या ते पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांशी जोडलेले आहेत.


*डॉ. उदय निरगुडकर* – पत्रकारिता, व्यवस्थापन आणि सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व. पुणे विद्यापीठातून मार्केटिंग मॅनेजमेंट विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली असून टाटा, गोदरेज यांसारख्या कंपन्यांत वरिष्ठ पदांवर काम केले आहे. लोकल ते ग्लोबल, All about Winning Indian Elections यांसारखी पुस्तके तसेच C.E.O. ही कादंबरी त्यांनी लिहिली आहे. राष्ट्रभक्ती जपणारे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.